2021-22 ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा    – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø त्वरीत प्रशासकीय मान्यता घेण्याचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

2021-22 ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा    – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø त्वरीत प्रशासकीय मान्यता घेण्याचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

चंद्रपूर दि.22 नोव्हेंबर : सन 2021-22 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 454 कोटी 34 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण योजनेकरीता 300 कोटी, आदिवासी योजनेंतर्गत 82.34 कोटी तर अनुसूचित प्रवर्गाच्या योजनांकरीता 72 कोटींचा समावेश आहे. सदर पूर्ण रक्कम जिल्ह्याच्या विकासासाठी असून कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या विभागाची रक्कम वेळेत खर्च करावी, असे निर्देश राज्याचे मदत व पूनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार सर्वश्री सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यापूर्वी नियोजन समितीच्या बैठकीत ज्या सुचना दिल्या आहेत, त्याचे वेळेत अनुपालन होणे गरजचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यता त्वरीत घेणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात वेळेत निधी खर्च केला तर अतिरिक्त 50 कोटींचा निधी विकासासाठी देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्याला अतिरिक्त निधी मिळाला पाहिजे, यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. वढा तिर्थक्षेत्रासाठी पहिल्या वर्षी नियोजन समितीमधून 5 आणि खनिज विकास निधीमधून 5 असे 10 कोटी  मंजूर झाले आहे. पुढील वर्षी आणखी 10 कोटी देण्यात येतील.

प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी आठ कोटी आणि दुरुस्तीकरीता 3.50 कोटींची तरतूद आहे. जिल्हा परिषदेने अद्याप 103 कोटींची प्रशासकीय मान्यता घेतली नाही. त्यांनी त्वरीत प्रस्ताव देऊन प्रशासकीय मान्यता घ्यावी. सर्व विभागांनी लवकरात लवकर मान्यता घेऊन वर्कऑर्डर, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. तसेच सर्व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांसाठी टायमर लावण्याचे नियोजन करण्यात येईल. यामुळे विजेची बचत होईल. बल्लारपूरचे स्टेडीयम नगर परिषदेकडे हस्तांतरीत करता येते का, याबाबत नियोजन करून जिल्हाधिका-यांनी आढावा बैठक घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणा-यांचा सन्मान राखा :  सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी – कर्मचारी, विद्यार्थी आदींचा शासकीय कार्यालयात योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. याबाबत काही तक्रारी कानावर आल्या आहेत. शासनाची नोकरी करीत असलो तरी ही जनतेची सेवा आहे. मालक म्हणून कुणीही वागता कामा नये. सर्वसामान्य लोकांच्या भेटीसाठी 2 ते 3 तासांची वेळ निश्चित करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात. विनाकारण कोणालाही प्रतिक्षेत ठेवू नका. असे प्रकार यापुढे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

तत्पूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांचा श्रध्दांजली प्रस्ताव आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडला. यावेळी उपस्थित सभागृहाने दोन मिनिटे उभे राहून ढुमणे यांना श्रद्वांजली वाहिली.

बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य प्रा. राजेश कांबळे, राजेंद्र वैद्य, गजानन बुटके, घनश्याम मुलचंदानी, दादाजी लाडे, प्रकाश देवतळे, अजय वैरागडे, संदीप गि-हे, नरेंद्र पढाळ, भोजराज उपासराव, मोरेश्वर टेंमुर्डे, अरुण निमजे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.