राजभवन येथे काव्य संमेलन व स्मृती सोहळा

राजभवन येथे काव्य संमेलन व स्मृती सोहळा

महावीर प्रसाद द्विवेदी यांचे जन्मगाव विकसित करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई, दि. 28 : महावीर प्रसाद द्विवेदी यांचे हिंदी साहित्य विश्वात मोठे नाव आहे. महावीर प्रसाद द्विवेदी त्यांचे जन्मगाव असलेल्या रायबरेली जिल्ह्यातील दौलतपूर गावचा साहित्यिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा या दृष्टीने आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.

 

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ.राम मनोहर त्रिपाठी सेवा समिती व श्रीमती दुर्गादेवी शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महावीर प्रसाद द्विवेदी स्मृती संरक्षण अभियान रजत जयंती सन्मान व मराठी – हिंदी कवी संमेलनाचे गुरुवारी राजभवन येथे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

 

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्याप्रमाणे संत तुलसीदास, मीराबाई, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गुरुनानक यांना विसरता येणे शक्य नाही, त्याचप्रमाणे हिंदी भाषेला प्रचलित रूप देणाऱ्या महावीर प्रसाद द्विवेदी व हजारी प्रसाद द्विवेदी यांना विसरता येत नाही. प्रसिद्ध साहित्यिक व माजी मंत्री डॉ.राम मनोहर त्रिपाठी मुंबई महानगरीत आले व महाराष्ट्राशी समरस झाले. डॉ राम मनोहर त्रिपाठी यांनी साहित्य, समाजकारण व राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आज हिंदी भाषा जागतिक भाषा झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदी समजली, बोलली जाते. महावीर प्रसाद द्विवेदी यांसारख्या साहित्यिकांचे योगदान तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमुळे हिंदी भाषा आज वैश्विक झाली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

 

कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी आमदार राज पुरोहित, गीतकार मनोज मुंतशीर, डॉ. मंजू पांडे, अनुराग त्रिपाठी, राजीव नौटियाल, समाजसेवक प्रशांत शर्मा, अनिल गलगली, ब्रिजमोहन पांडे यांसह साहित्यिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

राज्यपालांच्या हस्ते यावेळी डॉ राम मनोहर त्रिपाठी यांच्या रचना संगीतबद्ध केल्याबद्दल भजन सम्राट अनुप जलोटा तसेच आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मृति संरक्षण अभियान संस्थेचे निमन्त्रक गौरव अवस्थी यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी झालेल्या काव्य संमेलनात रामदास फुटाणे, सुनील जोशी, योगेंद्र शर्मा, राजीव राज व ज्योती त्रिपाठी यांनी काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमानंतर राज्यपालांच्या हस्ते सर्व कविवर्यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल त्रिवेदी यांनी केले.