अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा अहवाल तयार करून प्रशासनाने 302 कोटी 3 लक्ष 40 हजार रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला नुकताच सादर केला आहे.

जिल्ह्यात तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे एकूण 2 लक्ष 21 हजार 900 हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात बाधित शेतक-यांची संख्या 2 लक्ष 30 हजार 362 असून एकूण बाधित गावांची संख्या 1382 आहे. यात सर्वाधिक नुकसान चिमूर तालुक्यातील 44618 शेतक-यांचे असून बाधित क्षेत्र 30388.84 हेक्टर आहे. यानंतर वरोरा तालुका (शेतकरी संख्या – 37307, बाधित क्षेत्र – 57511.16 हेक्टर), भद्रावती तालुका (शेतकरी संख्या – 26128, बाधित क्षेत्र – 31711.70 हेक्टर), मूल तालुका (शेतकरी संख्या – 25898, बाधित क्षेत्र – 12795.51 हेक्टर), ब्रम्हपूरी तालुका (शेतकरी संख्या – 15791, बाधित क्षेत्र – 17840 हेक्टर) व इतर तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाने संपूर्ण 15 तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या शेती क्षेत्रासाठी निधीची मागणी शासनाकडे केली आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त 6469 हेक्टर क्षेत्रासाठी 8 कोटी 79 लक्ष 82 हजार रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यातील 17840 हेक्टरसाठी 24 कोटी 34 लक्ष 14 हजार रुपये, नागभीड तालुका 781 हेक्टरसाठी 1 कोटी 6 लक्ष 29 हजार रुपये, चंद्रपूर तालुका 14987 हेक्टरसाठी 20 कोटी 38 लक्ष 25 हजार रुपये, चिमूर तालुका 30388 हेक्टरसाठी 41 कोटी 32 लक्ष 88 हजार, सिंदेवाही तालुका 378 हेक्टरसाठी 51 लक्ष 48 हजार, गोंडपिपरी तालुका 6712 हेक्टरसाठी 9 कोटी 16 लक्ष 37 हजार, पोंभुर्णा 4296 हेक्टरसाठी 5 कोटी 84 लक्ष 75 हजार, मूल 12795 हेक्टरसाठी 17 कोटी 40 लक्ष 18 हजार, सावली 11801 हेक्टरसाठी 16 कोटी 4 लक्ष 95 हजार, जिवती 7988 हेक्टरसाठी 10 कोटी 86 लक्ष 38 हजार, कोरपना 8862 हेक्टरसाठी 12 कोटी 5 लक्ष 33 हजार, राजूरा 9373 हेक्टरसाठी 12 कोटी 76 लक्ष 80 हजार, भद्रावती 31711 हेक्टरसाठी 43 कोटी 18 लक्ष 47 हजार तर वरोरा तालुक्यातील 57511 हेक्टरसाठी 78 कोटी 27 लक्ष 23 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 2 लक्ष 21 हजार 898 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकूण 302 कोटी 3 लक्ष 39 हजार 424 रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.