श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मनपा सज्ज शहर नियंत्रण समिती अंतर्गत १५० अधिकारी कर्मचारी कार्यरत

श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मनपा सज्ज शहर नियंत्रण समिती अंतर्गत १५० अधिकारी कर्मचारी कार्यरत

चंद्रपूर ७ सप्टेंबर – चंद्रपूर शहरात दि. ९ सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी श्रीगणेश विसर्जन सोहळा असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे शहर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात सदर समितीत १५० अधिकारी कर्मचारी असुन विसर्जन सुरळीत पार पडावे यादृष्टीने विविध कार्ये केली गेली आहेत. बांधकाम विभागाद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी जाण्याचा मार्गांची माहीती घेऊन जोरदार पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यासाठी मनपाची विशेष मोहीम सुरु आहे. मुख्य मार्गावर खड्डे भरून काढण्यात आले आहेत तर इतर मार्गांवरील खड्डे भरण्यात येत आहेत. मार्गावरील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. ऑटोद्वारे विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या २ चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे. जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालाय कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफजॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात २४ कृत्रिम कुंड व २० निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन ५४६८ घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जित करणाऱ्या नागरिकांना विसर्जन स्थळी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.

स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.

गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ६ विसर्जन घाट मनपाने तयार केले आहेत. गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.