घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

घुग्गुस येथील 160 बाधित कुटुंबासाठी 16 लक्ष रुपये मंजूर

Ø मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता शब्द

Ø प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपये

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये देण्यात येईल, असा शब्द पिडीत कुटुंबाना दिला होता. दिलेला शब्द त्यांनी पाळला असून घुग्गुस येथे भुस्खलनाच्या दुर्घटनेप्रकरणी बाधित झालेल्या 160 कुटुंबांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 16 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे सदर रक्कम जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून बाधित कुटुंबाना तातडीने त्याचे वाटप करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले. या घटनेची मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पिडीत कुटुंबासाठी मंजूर करून आणला. भुस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेले 16 लाख रुपये मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखेतून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, चंद्रपूर शाखेतील खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. शासनाकडे पाठविलेल्या यादीनुसार आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून पिडीत कुटुंबांना मंजूर अर्थसहाय्याचे वाटप तात्काळ करण्यात यावे, अशा सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.