स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्याला अग्रक्रम असावा -जिल्हाधिकारी संदीप कदम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्याला अग्रक्रम असावा -जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा, दि. 15 : अनेक ज्ञात ,अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या असीम कष्टाने स्वातंत्र्य मिळालेले आहे. म्हणूनच त्या स्वातंत्र्याला जपणे आपले प्रथम आणि नैतिक कर्तव्य आहे. राष्ट्राभिमान ठेवत नागरिक म्हणून आपली सगळी मूलभूत कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे व लोकशाहीत सक्रियतेने सहभाग घेणे हे आपले अग्रकर्तव्य असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भंडारावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात श्री. कदम यांनी लोकमान्य टिळक गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा असुन स्वातंत्र्य लढ्यातील जिल्हयातील शुरवीरांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. आद्यकवी मुकुंदराजांनी आंभोरा येथे विवेकसिंधू ग्रंथ लिहिला. भंडारा शहरात 150 वर्षांची वाचक परंपरा जपणारे सार्वजनिक वाचनालय आहे. प्राचीन काळात मौर्य, सातवाहन, शुंग, वाकाटक या राजवंशांनी तर मध्ययुगात चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, गोंड, भोसले यांनी येथे दीर्घकाळ राज्य केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हयाने गेल्या वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने कृषी, आरोग्य, शिक्षण यांचा प्रगतीपर आढावा त्यांनी मांडला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात सन 2021-22 मध्ये एकूण 266.4 लाख प्राप्त निधीपैकी शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2022-23 मध्ये योजनेकरिता एकूण 291.65 लाखांचे नियोजन असून यात खरिपात 1 हजार 125 पीक प्रात्यक्षिके व रब्बी हंगामात 2 हजार 725 पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान मध्ये जिल्ह्याला 2021-22 आर्थिक वर्षात 210.37 लाख निधी प्राप्त झाला असून कृषी यंत्र व औजारे घटकावर हे अनुदान 239 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण अभियानात 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला एकूण 262.78 लाख निधी प्राप्त झाला असून हा सर्व निधी 312 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील गेल्या आठवड्यातील पुरपरिस्थीती बाबत नुकसानीबाबतचे पंचनामे करण्यात आले असून लवकरच संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे श्री.कदम म्हणाले.

मोफत सायकल वाटप योजना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जातीच्या इयत्ता 8 ते 12 च्या विद्यार्थीनींना सन 2021-22 या शैक्षणिक सत्रात प्रती तालुका 10 प्रमाणे तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व लाखांदूर या पाच तालुक्यात 49 मोफत सायकल वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमात मुख्य ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस, गृहरक्षक दल, छात्रसेना व विद्यार्थी यांची संयुक्त मानवंदना व संचलन करण्यात आले. त्यानंतर पावसामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा पोलीस सभागृहात घेण्यात आला. तत्पूर्वी,सकाळी 8.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचाकार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले.