स्मार्ट मोबाईल इतकेच स्मार्ट होणे आवश्यक  सायबर धोक्यांवर मुजावर अली यांचे मार्गदर्शन

स्मार्ट मोबाईल इतकेच स्मार्ट होणे आवश्यक  सायबर धोक्यांवर मुजावर अली यांचे मार्गदर्शन

चंद्रपूर १२ ऑगस्ट – सायबर सुरक्षेअंतर्गत – ऑनलाइन फसवणुक, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणुक’ टाळण्यासाठी सायबर नैतिकता पाळुन स्मार्ट होण्याची आवश्यकता असल्याचे सायबर प्रॅक्टीशनर मुजावर युसुफ अली यांनी मनपातर्फे आयोजीत फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ‘संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता मनपाच्या अधिकृत फेसबुक पेज #CMCchandrapur वर चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

आज मोबाईल घेतांना तो स्मार्ट हवा हा आपला आग्रह असतो मग तो वापरतांना आपणही तितकेच स्मार्ट असणे आवश्यक आहे नाहीतर मोबाईलद्वारे सायबर गुन्हेगार आपला वापर करतील.सायबर गुन्हे सुरक्षितता म्हणून सर्वात प्रथम सायबर नैतिकता, कोणता फोटो समाज माध्यमावर टाकावा, बँक खाते किंवा लॉटरी लागली, तुम्हाला मेसेज पाठवला आहे, तो उघडताना जो OTP येईल, तो आम्हाला कळवा, म्हणजे तुमचे नाव आमच्याकडे नोंदले जाईल, अशा प्रकारच्या संदेशापासून सावध राहणे आवश्यक आहे.

व्हिडीओ कॉल द्वारे सेक्सटॉरशन प्रकारचे गुन्हेही सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुलींचे किंवा स्त्रियांचे फोटो बदल करुन अश्लील चित्र टाकून नाव बदनाम करण्याची विकृती पण सायबर गुन्ह्यामध्येच येते.पश्चिम बंगालमधील आसनसोल, झारखंड मधील जामतारा येथुन देशभरातील ८० टक्के सायबर क्राईम ऑपरेट केले जातात.

यावर सर्वात रामबाण उपाय म्हणजे कोणत्याही परस्थितीत आपल्या कार्डच्या डिटेल्स फोनवर कोणालाही द्यायच्या नाहीत.तो जर बॅंकेतून बोलत असेल त्याला तुमचं कार्ड ब्लॉक झालेलं माहिती असेल तर त्याला कार्डचा नंबर देखील माहिती असायला हवां. पण सहसा आपल्याला असे प्रश्न पडत नाहीत. सायबर गुन्ह्यात आपल्याला ब्लॅक मेल केले जात असेल किंवा आपली फसवणुक झाली असेल तर, भीती न बाळगता लगेच पोलिसांत सायबर क्राईम विभागात तक्रार करणे आवश्यक आहे.

इंटरनेट सुरक्षेबाबत आज सातत्यानं बोललं जात असलं, तरी आपण अद्याप जागरुक नसल्याचं समोर आलं आहे. वरील सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास आपण हे सहज अमलात आणून सायबर गुन्हे कमी करण्यास प्रत्येक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू शकतो.