पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

गडचिरोली, दि.10: आज दिनांक 10 ऑगस्ट, 2022 रोजी भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासाकरीता गडचिरोली जिल्हयामध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला परंतु गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नागपूर/भंडारा/गोंदिया जिल्ह्यांमधून येणाऱ्या सततच्या अधिक विसर्गामुळे गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता वैनगंगा तसेच प्राणहिता, गोदावरी या नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत

नाही. तेव्हा नदीकिनारी सर्व संबंधितांनी उचित सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

दिनांक 07 ऑगष्ट, 2022 पासुन वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व गडचिरोली जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज या मधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत असुन अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हयात वाहणाऱ्या वैनगंगा, इंद्रावती नदीमध्ये पूरपरिस्थिती उद्भवलेली असून यामुळे बरेच मार्ग बंद आहेत तसेच प्राणहिता व गोदावरी या नद्यांकाठी सुद्धा पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता संबंधित सर्व

तहसिलदार विशेषतः देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, भामरागड, अहेरी व सिरोंचा यांनी संभाव्य पूरबाधीत भागात वेळोवेळी यंत्रणेमार्फत दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर पूरबाधित परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था वेळीच करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.