पोटॅशयुक्त खतांचे वापराबाबत शेतक-यांना आवाहन

पोटॅशयुक्त खतांचे वापराबाबत शेतक-यांना आवाहन

गडचिरोली, दि.05: पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात सतत होणा-या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे व त्यांच्या वहनासाठी व वनस्पतीची खोडे मजबुत होण्यासाठी उपयोग होतो. परिणामी पिकांचे कीड रोगापासून संरक्षण होते. पोटॅश हा उत्पादनाची चव रंग तजेलदारपणा व टिकावू क्षमता हे गुण ठरवणारा घटक आहे. याचा परिणाम बाजारात चांगल्या प्रतिचे उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास होतो. वातावरणातील अचानक बदलामुळे पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण यांना सामोरे जाताना पोटॅश पिकांना मदत करत असतो.

बाजरात म्युरेट ऑफ पोटॅश हे खत मुख्य स्त्रोत म्हणुन शेतात वापरले जाते. साधारणत: मिठासारखे दिसणारे चुर्ण किंवा दाणेदार स्वरुपात ही खते बाजारात उपलब्ध असून म्युरेट ऑफ पोटॅश खतामध्ये 60% पोटॅश म्हणजे पालाशचे प्रमाण असते, म्हणजेच 50 किलोच्या बॅग मध्ये 30 किलो पालाश पिकाला मिळते परंतू बाजारात उसाच्या मळीपासून प्रक्रिया करुन बनविलेले पोटॅश डिराईव्हड फ्रॉम मोलॅसेस (PDM)नावाचे पोटॅश खत उपलब्ध आहे. यात मात्र पालाशचे प्रमाण 14.50 % म्हणजे 50 किलोच्या बॅग मध्ये साधारण 7.25 किलो पोटॅश पिकाला मिळते. म्युरेट ऑफ पोटॅश व पिडीएम यामध्ये होणा-या गफलतीमुळे कृषी विद्यापीठ शिफारसी प्रमाणे खताचे प्रमाण योग्य दिले जात नाही, परिणामी पिकांची वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.

पोटॅश खते खरेदी करताना खताच्या पिशवीवरील पोटॅशचे प्रमाण वाचून अथवा माहिती घेवून खताची खरेदी करावी. पिकांना खताची मात्रा वापरतांना पिडीएम मधून प्रति बॅग 7.25 किलो तर म्युरेट ऑफ पोटॅश मधून प्रति बॅग 30 किलो पालाश मिळते या गोष्टीचा विचार करुन खताची मात्रा ठरवावी. ‘कृषिक ॲप’ नावाने महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त सहकार्याने एक मोबाईल ॲप तयार केले असून त्याचा वापर करुन पिकाला खताची मात्रा व किंमत यांचे परिगणना करुन खते खरेदी करावी जेणेकरुन शेतक-यांचा पिक उत्पादनावर होणारा खतांचा खर्च कमी होऊन चांगले व भरघोस उत्पादन मिळेल.

यामुळे म्युरेट ऑफ पोटॅश ज्यामध्ये 60% प्रमाण असलेल्या खतांच्या पिशवीचा वापर जर शेतकरी एक बॅग करत असतील तर P.D.M. नावाने जे खत मिळते त्याच्या चार बॅगचा वापर केल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खताची मात्रा पुर्ण होईल याची शेतकरी बंधूनी काळजी घ्यावी असे आवाहन श्री. दिलीप झेंडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, यांनी केले आहे.