‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात भंडारा पंचायत समितीची निवड

‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात भंडारा पंचायत समितीची निवड

  • राज्यातील 14 पंचायतराज संस्था
  • विकासासाठी मिळणार विशेष निधी

भंडारा, दि.24:- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्ताने देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशभरातील 75 पंचायतराज संस्थांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्रातील 14 पंचायतराज संस्था असून भंडारा पंचायत समितीचा या उपक्रमात समावेश आहे. उत्कृष्ट कामासाठी भंडारा पंचायत समितीचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

            केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवून या उपक्रमासाठी राज्यातील 14 पंचायतराज संस्थांची निवड करण्यात आल्याचे कळविले आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राव्दारे ही माहिती दिली आहे. या उपक्रमासाठी भंडारा, गोंदिया, अहमदनगर, जालना, गडचिरोली, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत व पंचायत समितीची निवड करण्यात आली आहे.

            आझादी का अमृत महोत्सव इंडिया @75 या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र सरकारतर्फे विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा पंचायत समितीची या उपक्रमासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी विनय मुन व गटविकास अधिकारी नुतन सावंत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून भंडारा पंचायत समिती यापुढेही उत्कृष्ट कार्य करेल अशी ग्वाही दिली.

भंडारा पंचायत समितीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यामुळे ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमात केंद्र सरकारने निवड केल्याबद्दल अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलीत असून अधिक चांगले काम करण्यासाठी उर्जा देणारी ही बाब आहे. भंडारा पंचायत समितीच्या या यशात सर्वांचा वाटा आहे. या निवडीबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे विशेष आभार- नुतन सावंत गटविकास अधिकारी पंचायत समिती, भंडारा