गोंडवाना सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

गोंडवाना सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

गडचिरोली:- स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज दिनांक २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे,सैनिकी निदेशक ऋषी वंजारी,नामदेव प्रधान तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ प्रा. राकेश चडगुलवार हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कारगिल विजय दिवसाच्या रेखाटलेल्या चित्रासमोर शाहिद जवानांना मानवंदना देण्यात आली.

प्रसंगी माजी सैनिक असलेले विद्यालयातील सैनिकी निदेशक ऋषी वंजारी यांनी कारगिल युद्धा बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली, तर कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. १९९९च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. यात अनेक जवानांना हौतात्मा पत्करावे लागले, त्यांच्या या कार्यातुन प्रत्येकाने काहीतरी शिकले पाहिजे, व देशसेवा हि मना मनात रुजविले पाहिजे असे मत अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य संजीव गोसावी यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संतोष कुलमथे यांनी तर रहीम पटेल यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.