लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘संवाद दिन’

लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘संवाद दिन’

Ø तक्रारी, अडचणींची न्याय भूमिकेतून होणार तत्परतेने सोडवणूक

चंद्रपूर, दि. 20 जुलै : शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय भूमिकेतून तत्परतेने सोडवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दुपारी 3 वाजता शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दिन आयोजित करण्यात येत आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस ‘संवाद दिन’ म्हणून पाळण्यात येईल.

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक विभागीय स्तरावर संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थी, पालक व शाळा, संस्था यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ संबंधित विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

असे असतील अर्ज स्वीकृतीचे निकष:

अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी. जिल्हास्तरावरील संवाद दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात किमान 15 दिवसआधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. जिल्हास्तरावरील संवाद दिनानंतर 1 महिन्याने विभागीय स्तरावरील संवाद दिनात अर्ज करता येईल. संवाद दिनासाठी जिल्हास्तरावर प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने किमान 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात येईल.

तर जिल्हास्तरावरील संवाद दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे व देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, व वैयक्तिक स्वरूपाची नसलेली तक्रार व निवेदने आदी बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांनी कळविले आहे.