पिकांच्या निगा घेणेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सूचना

पिकांच्या निगा घेणेबाबत जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सूचना

गडचिरोली, दि.20: गडचिरोली जिल्हयाचे जुन ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान 1254.1 मि.मि. आहे. जुलै मधील अपेक्षित सरासरी पर्जन्यमान 427.9 मि.मि. आहे. सन 2021-22 मध्ये या कालावधीत झालेले पर्जन्यमान 401.8 मि.मि. होते . या वर्षी जिल्हयात झालेल्या मुसळधार पावसामुळे आजअखेर 646.9 मि.मि. पावसाची नोंद महावेध च्या अहवालानुसार झालेली आहे. जुलै मधील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 151.2 टक्के इतका पाऊस जिल्हयात झालेला आहे. जिल्हयात भात 34127 हे., कापूस 14842 हे., तुर 5641 हे. क्षेत्रावर या मुख्य पिकांची पेरणी झालेली असून इतर पिकांसह 56355 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. जिल्हयातील पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र 204962 हेक्टर इतके आहे. सरासरीच्या तुलनेत 27.5 टक्के पेरणी सदयास्थितीत पूर्ण झालेली आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी भात, सोयाबिन व कापूस पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालावरुन निदर्शनास येते. झालेल्या नुकसानीबाबत अंतीम अहवाल प्राप्त होण्यासाठी सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसात गडचिरोली जिल्हयात अंशत: ढगाळ हवामान राहून दि. 20 ते 24 जुलै पर्यंत सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्‍याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

वरील सर्व आधारे खालीलप्रमाणे कृषि सल्ला देण्यात येत आहे. पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धान पिकाची रोपे तयार असतील तर धान पिकाची रोवणी करणे सुरु करावी व जर रोपांची वाढ किंवा दिवस जास्त झाले असल्यास रोपांची शेंडे खुडून रोवणी करावी. पुढील पाच दिवसात सर्वत्र ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या कारणास्तव खरीप पिकातील आंतरमशागतीचे कामे व कीटकनाशक व तणनाशकाची फवारणी पुढे ढकलावी. पुढील पाच दिवसाची स्थिती पाहता शेतकरी बंधूनी भाजीपाला कपाशी व कडधान्ये पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशा व्यवस्थापणासाठी पिकामध्ये चर काढावी. ज्या शेतकऱ्यांचे धान पिकाचे रोपे मागील आठवडयातील सतत च्या पावसामुळे खराब झाले असल्यास त्या शेतकऱ्यांनी धान पिकाची दुबार लावणी करण्यासाठी धान पेरीव पध्दतीने लावणी करावी किंवा चिखल पऱ्हे पध्दतीने कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागणी करावी. रोपवाटिका गादीवाफयावर वर लावावी. दापोग पध्दतीने पेरणी करावी. पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. वेळेवर पेरलेल्या सलग तुरीच्या शेताचे नियमीत निरीक्षण करावे. रोपावस्थेत मर रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन वेळेवर पेरणी केलेल्या तूर पिकामध्ये निंदणी करावी व पिक तणविरहीत ठेवावे. कापूस पिकाकरीता पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कपाशीच्या शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत. मर किंवा मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊस उघडल्यानंतर मर झालेल्या रोपांच्या जागी नांग्या भराव्यात तसेच जास्तीच्या रोपांची विरळणी करावी. दुबार पेरणी करतांना BBF Planter चा वापर करावा. कापूस व भात पिकाची दुबार पेरणी करतांना कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.