अमली पदार्थ विरोधी समितीने कारवाई गतिमान करावी  – जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव

अमली पदार्थ विरोधी समितीने कारवाई गतिमान करावी  – जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव

भंडारा दि. 11 : अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई गोवल्या गेली आहे. ड्रग्ज सारख्या अमली पदार्थाचे सेवन, वाहतूक, विक्री आदी व्यवसायात तरुण मुलांसोबत मुलीसुध्दा अडकल्या आहेत. महानगरासोबत ग्रामीण भागात सुध्दा हा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी समितीने कारवाई गतिमान करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक तथा या समितीचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी आज बैठकीत केले.

तरुणाईसमोर भेडसावणारी एकमेव समस्या अमली पदार्थ असून त्याबाबत पोलीस प्रशासनाद्वारे उपाययोजना करण्यात करण्यात येत आहेत. याबाबत राज्य व जिल्हास्तरीय समिती सुध्दा गठीत करण्यात आली असून यात पोलीस विभागासह महसूल, वन, सिमा सुरक्षा, राज्य उत्पादन, पोस्ट विभाग व अन्न व औषध विभागाचा समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विविध अमली पदार्थ सेवन, बाळगणे, वाहतूक करणे आदी बाबत वेगवेगळे नियमानूसार कारवाई करण्यात आली असून समस्यांचे निराकरणासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. याबाबत सर्वदूर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

इंटरनेट प्रमाणेच डार्कनेटद्वारे अमली पदार्थांची वाहतूक पोस्टाच्या माध्यमातून होतांना आढळून आले. त्यामुळे पोस्ट विभागाची जबाबदारी महत्वाची आहे. याबाबत सायबर सेलद्वारे सोशल मीडियाची चौकशी करण्यात येत आहे. तरुण मुलांमुली सोबतच शाळकरी मुले सुध्दा यात आढळले आहे. या मुलांना प्रलोभनाद्वारे प्रोत्साहित करुन आपल्या जाळ्यात अडकविण्यात येते. खुळ्या कल्पनाद्वारे प्रोत्साहनाला बळी पडून आपसूक ओढावतात व सवयीचे रूपांतर व्यसनात होते. याच व्यसनाधिनतेमुळे मुली पैशाच्या चणचणीमुळे वेश्या व्यवसायाकडे वळतात. नंतर त्यांची मानसिक व शारीरिक परिस्थिती भयावह होते. त्यामुळे पालकांनी सुध्दा सावध राहणे गरजेचे असून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरात तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये गेल्या वर्षभरात शंभर लोकांवर कारवाई झाली असून 19 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. या संदर्भात होणाऱ्या कारवाईचे प्रमाण वाढले असून जिल्हा अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी देखील सामान्य नागरिकांनी जागरूकपणे पोलिसांचे कान, नाक, डोळे होणे आवश्यक आहे. सोबतच आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे यासाठी सर्व स्तरावर सकारात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.