पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात

सध्या मान्सून कालावधी असल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या विविध नद्या/उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या/धरणे मधून वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाणी/विसर्ग यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या/नाल्यांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन दक्षिण गडचिरोली मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली असून इतर भागातही पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करणेस्तव संबंधित सर्व विभागांमध्ये सुसमन्वय असणे गरजेचे आहे.

दिनांक 08.07.2022 पासून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संलग्न जिल्ह्यात, तसेच गडचिरोली जिल्ह्यात दोन-तीन दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज यांमधून विसर्ग प्रवाहीत करण्यात आल्याने मेडीगड्डा बॅरेज स्थळी गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असल्याने बॅरेजचे 75 गेट उघडण्यात आलेले असून टप्प्या टप्प्याने विसर्गामध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत आज दुपारी 6.00 वाजताच्या नोंदीनुसार मेडीगड्डा बॅरेजमधून 8.83 लक्ष क्युसेक्स विसर्ग प्रवाहीत होत असुन इंद्रावती नदीवरील पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार 2.56 लक्ष क्युसेक्स विसर्ग आहे. गोदावरी व इंद्रावती नदीच्या संगमाचे ठिकाणी 11.39 लक्ष क्युसेक्स विसर्ग प्रवाहीत होत असून नदीच्या बॅक वॉटर मुळे सिरोंचा, अहेरी व भामरागड या तालुक्यातील नदी, नाल्याच्या काठी असलेल्या गावांमध्ये पूर स्थिती उद्भवलेली असुन बहुतांश गावांचा संपर्क तुटलेला आहे. पाणलोट क्षेत्रात पाण्याचा सतत येवा वाढत असल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून सूचना प्राप्त झालेली असून नदीकाठावरील गावात भरपूर प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच, आज दि. 10.07.2022 रोजी हवामान विभागाने पुढील 72 तासाकरिता गडचिरोली जिल्ह्याकरीता पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे.

सद्य:स्थितीत गोदावरी नदी ही कालेश्वरम स्टेशन (सिरोंचा) येथे इशारा पातळीच्या वर वाहत असून धोका पातळीच्या 0.50 मीटर ने खाली वाहत आहे. सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी नदीच्या *पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यात नदी किनारी असलेल्या गावांतील नागरीकांनी विशेष सतर्कता बाळगावी*. विशेषत: तहसिलदार भामरागड, अहेरी व सिरोंचा यांनी प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकतेनुसार तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच मेडीगड्डा बॅरेज, ता. सिरोंचा मधून प्रवाहीत होणाऱ्या विसर्गामुळे *खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरेवला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडागटृटा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात यावी.* तहसिलदार सिरोंचा यांना सदर भागात वेळोवेळी दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या आहेत.

इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.