कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

शेत जमीन विक्रीकरिता अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 6 : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असून शेतमजुराला कसण्यासाठी दोन एकर जिरायती किंवा दोन एकर जमीन शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते. जिल्ह्यात या योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांना शासकीय दराने शेती विकायची आहे त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांच्याकडे त्वरित अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

या योजनेतील अटी शर्तीनुसार शेती किमान दोन एकर ओलीताची किंवा चार एकर कोरडवाहू असावी. शेतजमीन खरेदीची कमाल मर्यादा नाही. शेतजमीन खरेदीकरीता जिरायती जमीनीसाठी प्रती एकर पाच लाख व बागायती जमीनीसाठी प्रती एकर आठ लाख इतकी कमाल मर्यादा आहे. शेत जमीन सुपीक व कसण्यायोग्य असावी. शेतीवर कर्जाचा बोजा नसावा. याकरीता प्राथमिक सहकारी कृषी पुरवठा सेवा सोसायटी, कृषी पतपुरवठा करणारी बँक तसेच इतर कोणत्याही बँकांचे थकबाकी नसल्याचे नाहरकरत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शेतजमीनीवर एकापेक्षा अधिक भोगवटदारांची नावे असल्यास संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे तसेच शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यतिरीक्त त्यांचे कुटूंबातील कमीत कमी दोन व्यक्तींचे शेतजमीन विक्रीबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेतजमीनीवर वित्तीय बोजा नसल्याबाबतचे तलाठी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाने वाटप केलेली, अनुसूचीत जमातींच्या व्यक्तींची शेतजमीन, धार्मीक स्थळांची, रस्ता/ पांदन यामध्ये जाणारी, गायरान शेतजमीन खरेदी करण्यात येणार नाही. शेती बुडीत क्षेत्रात येत असल्यास, पुनर्वसन क्षेत्रात येत असल्यास, कोणत्याही प्रकल्प, कालवा किंवा अन्य कोणत्याही बाबीकरीता शेती संपादीत झाली असल्यास किंवा याबाबत सर्वेक्षण झाले असल्यास जमीन विक्रीकरीता अर्ज करू नये. याबाबत संबंधीत तलाठी यांचे शेतजमीन निबाधीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे. शेतजमीन विक्री प्रस्ताव ज्या गावातील आहे त्या गावातील तलाठी यांनी दिलेला मागील पाच वर्षांचा खरेदी – विक्री दराचा तक्ता जोडणे आवश्यक आहे. शेतजमीनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचे तालूका निरीक्षक भुमी अभिलेख यांचे टाचण व नकाशासह अहवाल आवश्यक आहे.

शेतजमीन विक्रीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय समीतीमार्फत शेतजमीनीची पाहणी करण्यात येईल. शेती सुपीक व कसण्यायोग्य असल्यास शासकीय दराने खरेदी करण्यात येईल व शेतजमीनीच्या रकमेचे भुगतान भारतीय स्टेट बँकेच्या धनादेश/ धनाकर्षाव्दारे करण्यात येईल. सातबारा उताऱ्यावर जेवढे खातेदार असतील त्या सर्वांना सारख्या रकमेचा धनादेश/ धनाकर्ष अदा करण्यात येईल. शासकीय दराने जमीन विक्रीस तयार असल्यास रजिस्ट्रीच्या अगोदर जमीन मोजणीची क प्रत शेतमालकाने सादर करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समीतीसमोर चर्चेव्दारे जमीन खरेदीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना शासकीय दराने शेती विकायची आहे त्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परीषद चौक, भंडारा येथे संपर्क साधावा व शेतजमीन विक्रीबाबत अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.