भंडारा : साकोलीत स्वयंचलीत हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण  

साकोलीत स्वयंचलीत हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण  

भंडारा, दि.13:- हवामान व त्यातील बदल हा शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे व दिवसेंदिवस जिल्ह्यातील होत असलेला हवामान बदल व त्याचा कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संवेदनक्षम हवामान बदलासह समरस करणे व त्यांची तत्संबंधी क्षमता बांधणी करणे तसेच हवामान अंदाजासोबत कृषी सल्ला प्राप्त व्हावा या उद्देशाने स्वयंचलीत कृषि हवामान यंत्रणेची उभारणी कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे करण्यात आली आहे. नुकतेच राहिलेले काम पूर्ण झाले असुन आता या स्वयंचलीत हवामान यंत्रणेद्वारे जमिनीतील ओलावा पासून ते सूर्यप्रकाशाचा कालावधी यांसारख्या शेतीउपयोगी आठ घटकांची माहिती मिळणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे गेल्या वर्षापासून ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेमधून जिल्हास्तरीय कृषि हवामान केंद्र (दामू) स्थापन झाले आहे. हवामान व त्यातील बदलानुसार शेतकऱ्यांना छोट्यात छोट्या घटकाची माहिती व्हावी याकरिता कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथे स्वयंचलीत हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली असून आता याद्वारे हवामानाची आकडेवारी संकलीत करण्यात येईल. यामध्ये कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा तासी वेग व वाऱ्याची दिशा, जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान, या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होणार आहेत. यामुळे भविष्यात हवामानाचा अचूक अंदाज देता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या माशागातीपासून ते काढणी पर्यत माहिती मिळण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे योग्य नियोजन करता येईल.

 कृषि सल्ला पत्रक आठवड्यातुन दोनदा (मंगळवारी आणि शुक्रवारी) तयार करण्यात येते व व्हाट्स अ‍ॅप व एम. किसान च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जातो यामध्ये माती परीक्षण, यांत्रिकीकरण, बीजप्रकिया, खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, पशुपालन व्यवस्थापन, आपात्कालीन पीक व्यवस्थापन तसेच पिकनिहाय माहिती दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज व मागील आठवडयात अनुभवलेले हवामान यावर आधारीत कृषि सल्ला पत्रिका तज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार करून ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत सामाजिक माध्यमांद्वारे पोहोचविण्याचे काम हे केंद्र सतत करत आहे. तरी या स्वयंचलीत कृषी हवमान यंत्रणेवर आधारीत कृषी सल्ला पत्रकाचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा याकरिता कृषी विज्ञान केंद्र  साकोली येथील विषय विशेषज्ञ कृषि हवामान लयंत अनित्य (9421804802) व कु प्रियांका जांभोळे कृषी हवामान निरीक्षक यांच्याशी संपर्क करावा

महत्वपुर्ण आठ घटकांची स्वयंचलीत पद्धतीने मिळणार माहिती

देशातील 196 जिल्हे हे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्याचा ही समावेश आहे. दुसरीकडे राज्यातील दहा जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्र प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित झाली आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या सर्वेक्षणासाठी हवामान विभागाचे पथक पाहणीसाठी येणार आहे. जमिनीतील ओलाव्या पासून ते सूर्यप्रकाशाची प्रखरता अशा आठ घटकांची माहिती  व्हाटस ॲप, मोबाईल टेक्स संदेश, एम किसान पोर्टल तसेच शेतकरी प्रशिक्षणे व प्रक्षेत्र भेटी दरम्यान तसेच कृषि व सलग्न विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविली जाणार आहे. मधल्या काळात लॉकडाऊन मुळे हवामान केंद्र कार्यान्वित होण्याच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता जिल्ह्यातील हवामानाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच हवामानाचा अंदाज व कृषी विषयक सल्ला मिळणार आहे व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.एन. एस. वझिरे नोडल अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांनी केले आहे.