विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे Ø अपूर्ण दस्तऐवजांची त्रुटीपुर्तता करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे Ø अपूर्ण दस्तऐवजांची त्रुटीपुर्तता करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 14 जून : सत्र 2022-23 एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड आदीकरीता सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेमध्ये मागासवर्ग सवलतीचा दावा केला आहे. तसेच मागासवर्ग सवलतीचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत, मात्र अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज दि. 30

जुन 2022 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,चंद्रपूर कार्यालयाकडे सादर करावे. त्यामध्ये, ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मुळ शपथपत्रे फॉर्म न.3 व 17 आणि जातीदावा सिद्ध करणारे व अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे ( अनु.जातीकरीता 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती व भटक्या जमातीकरीता 21 नोव्हेंबर 1961, व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग उमेदवारांसाठी 13 ऑक्टोबर 1967) महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांच्या छायांकित प्रती कार्यालयात सादर करुन ऑनलाईन भरणा केलेल्या पावतींची पोहोच घ्यावी.

31 मे 2022 अखेर शैक्षणिक, सेवा, निवडणूक प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांना त्रुटीचे ई-मेल ऑनलाईन प्रणालीद्वारे पाठविण्यात आले आहे. तसेच त्रुटी पुर्ततेकरीता पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आले आहे. परंतु जे अर्जदार, उमेदवार ई-मेल आणि त्रुटीबाबत अनभिज्ञ आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटी पुर्ततेकरीता दि. 15 ते 17 जून किंवा 20 ते 22 जून किंवा 22 ते 24 जुन 2022 पर्यंत प्रत्यक्षात कार्यालयात येऊन त्रृटीची पूर्तता करून घ्यावी. त्रृटीपुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडून फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रकरणी प्रवेशासाठी, निवडणूक आणि सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील.

प्रवेशासमयी जात वैधता प्रमाणपत्राअभावी येणाऱ्या अडचणींचा विचार करता वेळेच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा आणि त्रृटीची पुर्तता करून घ्यावी. जेणेकरुन, सत्र 2022-23 मध्ये प्रवेशाकरीता जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व उमेदवारांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही. जात प्रमाणपत्र पडताळणीचा वेळेपूर्वी अर्ज सादर न केल्याने किंवा त्रृटीची पुर्तता न केल्याने प्रवेशासमयी जात वैधता प्रमाणपत्रा अभावी अर्जदार प्रवेशापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.