बेघर बांधवांना मिळतो मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

बेघर बांधवांना मिळतो मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

चंद्रपूर, ता. ४ जुन : उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.
नागरी भागातील बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी रात्री सर्वेक्षण करून बेघरांना निवाऱ्यामध्ये आणण्यात येते. रात्रीच्या सुमारास कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी अनेक जण या केंद्रापर्यंत येत नाही. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्याना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
उघड्यावर झोपतांना कुठल्याही स्वरूपाची हानी होऊ नये याकरीता मनपा प्रशासनातर्फे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असुन याअंतर्गत महाकाली मंदिर, उडडाणपुल, शनी मंदिर, फूटपाथवरील बेघर लाभार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील बेघर निवाऱ्यात आणण्यात आले. येथे एकुण १५ बेघर लाभार्थी सध्या निवाऱ्यामध्ये वास्तव्यास आहे.