अंमली पदार्थ वाहतूक, विक्री आढळल्यास कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

अंमली पदार्थ वाहतूक, विक्री आढळल्यास कडक कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

 

चंद्रपूर, दि. 08 : जिल्ह्यात अंमली पदार्थ वनस्पती (खसखस, गांजा) लागवड किंवा पदार्थाची वाहतूक तसेच विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

 

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, केंद्रीय अबकारी विभागाचे अधिक्षक श्याम सोनकुसरे, डाक अधिक्षक गणेश सोनुने, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त उमाकांत बाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिजीत लिचडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्थाची जिल्ह्यात कुठे लागवड होत असेल तर कृषी विभागाने कृषी सहाय्यकामार्फत तपासणी करणे. तसेच गोपनीय पध्दतीने लोकांकडून याबाबत माहिती मिळविणे. शिक्षण विभागाने शालेय स्तरावर अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणा-या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी. सरकारी किंवा खाजगी कुरीअर मार्फत कुठे वाहतूक होते का, याची तपासणी करणे. खाजगी कुरीअरधारकांना याबाबत पोलिस विभागाने पत्र लिहून त्यांना याबाबत अवगत करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

 

अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची कार्यकक्षा : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा घेणे. जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही, याची दक्षता घेणे. डार्कनेट व कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही, याकडे लक्ष देणे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेल्या व्यक्तिंची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाचे व्यसन आहे, याबाबत माहिती प्राप्त करणे. ड्रग डिटेक्शन किट व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करणे. जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती अभियान राबविणे. जिल्हा पोलिस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या कार्यवाहिची माहिती संकलित करून त्याबाबतचा डेटाबेस तयार करणे. एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्ह्यांचे तपास अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण आयोजित करणे. जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेणे तसेच जे कारखाने बंद आहे त्यावर विशेष लक्ष ठेवणे.