गडचिरोलीत 22 ठिकाणी शासकीय योजनांच्या जत्रेतून 1.84 लक्ष नागरिकांना लाभ

गडचिरोलीत 22 ठिकाणी शासकीय योजनांच्या जत्रेतून 1.84 लक्ष नागरिकांना लाभ

अजूनही जिल्हयात 40 ठिकाणी भरणार योजनांची जत्रा

गडचिरोली, दि.26: ‘शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी’ हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा हे अभियान गडचिरोलीत विविध तालुक्यांमध्ये राबविले जात आहे. सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून शिबीरांचे आयोजन करून थेट गावागावात योजना पोहचविल्या जात आहेत. आत्तापर्यंत गडचिरोली जिल्हयात 22 ठिकाणी योजनांची जत्रा भरविण्यात आली होती. यामध्ये एकुण 184241 लाभार्थ्यांना वेगवेगळया योजनेत लाभ वितरीत करण्यात आला. नागपूर विभागातून गडचिरोली जिल्हयाने दमदार कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्हयाची प्रशंसा केली. नागपूर विभागात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रतातून सुक्ष्म नियोजनाद्वारे गरजूंना आवश्यक मदत देण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा कार्य करीत आहेत. गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत ‘नागरिकांचे लाभ वितरण प्रणाली’ तयार करण्यात आली होती. सदर प्रणालीचा वापर करुन ज्या पात्र नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळला नव्हता त्या नागरिकांची यादी तयार करुन शासकीय योजनांची जत्रा गडचिरोलीतील तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

अभियानाची तयारी म्हणून दिनांक 01 एप्रिलपासून नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास, नॉनक्रिमीलीअर, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, नवीन व दुय्यम रेशन कार्ड, जॉबकार्ड, पीएम किसान योजनेचे नवीन व दुरुस्ती करुन लाभ देण्यात आला, राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी यांना लाभ देण्यात आला, मतदार नोंदणी व दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज मोफत दाखल करुन नागरिकांना मोफत लाभ वितरण करण्यात आले.

तसेच कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर, जंतनाशक औषधी वाटप करण्यात आले. कामगार विभागाने नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले, आरोग्य विभागाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आयुष्यमान कार्ड (Gold card) बनवून नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पीएम सुरक्षा योजनेचे व पीएम जीवन ज्योती वीमा योजनेचे अर्ज नागरिकांकडून भरुन घेण्यात आले. व सदरच्या नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच ग्रामपंचायत मार्फत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. सामाजीक वनिकरण विभागाणे नागरिकांना झाडे वाटप केली.

मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मत्स्य व्यवसाय साधनावर अर्थसहाय योजने अंतर्गत नागरिकांना लाभ प्रदान करण्यात आला. तसेच नागरिकांना वीज जोडणी महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत देण्यात आली. कौशल्य विभाग अंतर्गत तरुणांची कौशल्य विकास प्रशिक्षण करीता नोंद करण्यात आली. गडचिरोली उप अधिक्षक भुमीअभिलेख विभागामार्फत नागरिकांना रि नंबरींग देण्यात आले.

शासकीय योजनांच्या जत्रेत लाभाबरोबर विविध योजनांची माहिती व योजनांचे महत्त्व अभियांनस्थळी देण्यात येत आहे. शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमांत स्थानिक खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. जिल्हयातील प्रत्येक विभाग आणि विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग असून गरजूंना लाभ वितरीत करण्यासाठी त्यांचे योगदान आहे. येत्या काळात उर्वरीत 40 ठिकाणी असेच यशस्वी उपक्रम राबविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुका निहाय 22 उपक्रमांची आकडेवारी – गडचिरोली दोन कार्यक्रमातून 25714 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, धानोरा एका कार्यक्रमातून 3651 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, आरमोरी तीन कार्यक्रमातून 43711 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, देसाईगंज दोन कार्यक्रमातून 16174 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, कुरखेडा तीन कार्यक्रमातून 10689 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, कोरची तीन कार्यक्रमातून 4191 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, चामोर्शी दोन कार्यक्रमातून 31756 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, मुलचेरा एका कार्यक्रमातून 6600 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, एटापल्ली एका कार्यक्रमातून 3278 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, भामरागड एका कार्यक्रमातून 7106 लाभार्थ्यांना लाभ वितरीत, अहेरी दोन कार्यक्रमातून 12977 लाभार्थ्यांना लाभ वितरीत व सिरोंचा एका कार्यक्रमातून 18394 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला.

विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर

सर्वसामान्य गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून एप्रिल, मे महिन्यात नागपूर विभागात आयोजित‎ शासकीय योजनांच्या जत्रेतून विविध यंत्रणांमार्फत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. संबंधित लाभार्थींना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ योजनांचा लाभ देण्यासाठी कोणकोणत्या‎ कागदपत्रांची आवश्यकता आहे, त्याची‎ पूर्तता लाभार्थींकडून करुन घेणेत येत आहे.‎ लाभार्थींकडून योजनेचा लाभ‎ मिळण्यासाठी अर्ज सादर केले जात आहेत. कोणत्याही गरजू लाभार्थींचा अर्ज नामंजूर‎ केला जाणार नाही याची जबाबदारी‎ संबंधित विभाग घेत असून प्रत्येक जिल्हास्तरीय यंत्रणेचा‎ या जत्रेमध्ये सहभाग आहे.‎ गडचिरोली जिल्हयाने या उपक्रमात आत्तापर्यंत चांगले काम केले असून 1.84 लक्ष लाभार्थीना लाभ दिला आहे ही चांगली बाब आहे.

जिल्हाधिकारी गडचिरोली, संजय मीणा-

शासकीय योजनांच्या जत्रेतून नागरिकांना चांगल्या प्रकारे मदत मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनकल्याण कक्ष व तालुका जनकल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात तहसिलदार अध्यक्ष असून प्रत्येक विभागाचे तालुका अधिकारी सदस्य आहेत या समितीमार्फत तालुकास्तरावर सनियंत्रण केले जाते. जिल्हा स्तरावरून या उपक्रमाबाबत दैनंदिन आढावाही घेण्यात येतो. जिल्हयात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उर्वरीत 40 शिबीरांमधून लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.