विनापरवानगी वृक्षतोड झाल्यास दाखल होणार गुन्हा

विनापरवानगी वृक्षतोड झाल्यास दाखल होणार गुन्हा

दंडात्मक कारवाई प्रस्तावित

हेरीटेज वृक्षांना मिळणार माहितीचे फलक

 

चंद्रपूर २४ एप्रील – चंद्रपूर शहरात परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई होणार असुन विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोड करायचे असल्यास त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते.

महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन (शहरी विभाग) कायदा, १९७५ नुसार राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येते. या कायद्यानुसार विनापरवानगी वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल करणे व १ लाखापर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

 

झाडांचे महत्व –

आज शहरात वृक्षांची अत्यंत आवश्यकता आहे, चंद्रपूर शहरात तर तापमान नवे उच्चांक गाठत असते अश्या परिस्थितीत झाडांचे महत्व ओळखणे आवश्यक आहे. झाडे तापमान नियंत्रित करून एखाद्या भागाचे तापमान १ तेे ५ अंशांपर्यंत कमी करू शकते. झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन देत असते. प्रत्येक झाड हे पाणी जमिनीत पोहचवते. यामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढते.झाड हे पाणीसाठा सुद्धा करते, यामुळे दुष्काळाची शक्यता कमी होते.

झाडांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात जाण्यापासून रोखल्या जाऊन पुरापासून वाचता येते.झाडे प्रदूषित हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते. योग्य ठिकाणी झाडे लावल्यास थंड हवा देणाऱ्या यंत्रांची गरज कमी होते व झाडामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे झाडे मातीतील विषारी पदार्थ सुद्धा शोषुन घेते अश्या विविध पद्धतीने झाड हे मानवासाठी उपयुक्त आहे.