वाढत्या तापमानात उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा Ø जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

वाढत्या तापमानात उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा

Ø जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 

चंद्रपूर, दि. 21: यावर्षी उन्हाळा अतिशय तीव्र असून त्यापासून उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवड्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 42 ते 43 अंश पर्यंत गेले आहे. येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये व मुख्यत: मे महिन्यामध्ये ते अतिशय उच्चतम पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या तापमानात नागरिकांनी उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

 

वाढत्या तापमानाचा परिणाम गाव, खेडी, वाडी, वस्ती तसेच शेतामध्ये काम करणारे शेतकरी व मजूर आणि नागरिक यांच्यावर होण्याची शक्यता आहे. उष्माघातापासून जनतेला त्रास होऊ नये, म्हणून सर्व वैद्यकीय व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड वॉर्डचे नियोजन केले. आहे. तसेच उष्माघातावर लागणारी औषधी व उपाय योजनांचे नियोजन केलेले आहे.

 

उष्माघाताची लक्षणे : या लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमान, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, जलद हृदयाचे ठोके, आणि गोंधळल्यासारखी स्थिती यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये दौरा पडणे, कोमावस्था, आणि मृत्यू देखील होऊ शकतो. लक्षणे ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. तीव्र उन्हामध्ये थांबल्यामुळे शरीराचे तापमान वाढते. घाम येऊ लागतो, शरीरातील पाणी कमी होते, शरीरातील प्रोटीन उकडू लागतात, रक्तदाब कमी होतो यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो व शरीरातील एक एक संस्था निकामी होते. व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

 

नागरिकांनो अशी घ्यावी काळजी : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे उन्हामध्ये जास्त वेळ राहणे टाळावे. सावलीत कामे करावी. सकाळी 11 ते दुपारी ४ या कालावधीमध्ये उन्हात काम करू नये, टोपी आणि पांढऱ्या रंगाचे सुती सुती कापड वापरावे, भरपूर पाणी प्यावे, सोबतच ORS चा वापर करावा. तसेच पाणी युक्त फळे खावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास आरोग्य यंत्रणेशी त्वरित संपर्क करावा, व उपचार करून घ्यावा. उष्माघात हा उपचारापेक्षा टाळण्याची आवश्यकता आहे व ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. उपचाराच्या सर्व सोयी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी सांगितले.