सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन

सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र

पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन

 

चंद्रपूर, दि. : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारा जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंतच्या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप, त्रुटीपूर्तता आदीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे.

 

सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत 17 ते 21 एप्रिल व 24 ते 28 एप्रिल 2023 दरम्यान त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केला आहे परंतु, अपूर्ण पुराव्या अभावी ज्यांची प्रकरणे त्रुटी मध्ये आहे, त्यांनी दिलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊन सामाजिक न्याय पर्व यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर यांनी केले आहे.

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे 31 मार्च 2023 अखेरीस 12 वी मध्ये प्रवेशित एकूण 8 हजार 126 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 210 प्रकरणे समितीच्या कार्य क्षेत्राबाहेरील असून 6 हजार 779 प्रकरणे समितीकडे सादर करण्यात आली आहे व त्यापैकी 6 हजार 532 प्रकरणांमध्ये जातवैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. तसेच इयत्ता 11वी मध्ये प्रवेशित एकूण 9 हजार 666 विद्यार्थ्यांपैकी 441 प्रकरणे समितीच्या कार्य क्षेत्राबाहेरील असून 856 प्रकरणे समितीकडे सादर करण्यात आली आहे व त्यापैकी 621 प्रकरणांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे. तसेच प्रकरणे स्वीकारणे व निकाली काढण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. सन 2022-23 सत्रामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 2 हजार 981 प्रकरणे स्वीकारण्यात आली. त्यापैकी 2 हजार 756 प्रकरणे समितीकडून निकाली काढण्यात आली आहे.

 

सन 2022-23 मध्ये प्रवेशित इयत्ता 11वी व 12वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी केलेली नाही तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम सीईटी देऊन 2023-24 मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय पर्वाच्या विशेष मोहिमेत सहभागी होऊन जात प्रमाणपत्राची पडताळणी आवर्जून करून घ्यावी. असे समितीमार्फत कळविण्यात आले आहे.