शासनाच्या लोक कल्याणकारी योजना लोककला पथकाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचणार

शासनाच्या लोक कल्याणकारी योजना लोककला

पथकाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचणार

भंडारा, दि. 9 : विद्यमान शासनाला नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. शासनाच्या या यशस्वी कारकिर्दीतील योजना खेडोपाडी व माणसात पोहोचण्यासाठी जिल्हा पातळीवरील तीन कलापथक 9 ते 17 मार्च दरम्यान गावांमध्ये योजनांचा जागर करणार आहेत. महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना लोकांच्या भाषेत लोककलेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे लोकांपर्यंत पोहचतात.  झाडीपट्टीच्या बोलीभाषेतून भंडारा जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांचे उद्देश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला शासनाने 50 हजार रुपये दिले. यासह शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, अतिवृष्टीत झालेल्या पिकाची, जमिनीची नुकसान भरपाई, महिलांच्या कल्याणासाठी राखीव निधी, विद्यार्थी, कास्तकार, दिव्यांगासाठीच्या योजनांची माहिती, रमाई आवास योजना, आवास योजना, पेय जल योजनांची माहिती कधी गीत, कधी पोवाडा, कधी गवळन या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत.

आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावात हा लोक जागर होईल. शासनाच्या योजना अत्यंत सोप्या भाषेत लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून पोहचतील. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांनी ह्या कला पथकाचा जागर 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत मोठ्या गावात ठेवला आहे.