जिल्ह्यात 10 हजार 365 मॅट्रीक टन युरिया शिल्लक

जिल्ह्यात 10 हजार 365 मॅट्रीक टन युरिया शिल्लक

 

चंद्रपूर, दि.24 : रब्बी हंगामात कृषी विभागाने विविध पिकाच्या गरजेनुसार युरिया खताची 15 हजार 32 मॅट्रिक टन मागणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे नोंदविली होती. त्याअनुषंगाने आजपर्यंत जिल्ह्यात 19 हजार 788 मॅट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून 10 हजार 365 मॅट्रीक टन युरिया शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये युरिया खत उपलब्ध आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात 1 लक्ष 18 हजार 949 हेक्टर पेरणी झाली आहे. त्यापैकी गहू 16335 हेक्टरवर, हरभरा 62372 हे., ज्वारी 6432 हे., मका 1291 हे., मुंग 2195 हे., उडीद 1757 हे., जवस 1284 हे., तीळ 8.20 हे., करडी 911 हे., मोहरी 182 हे. सोयाबीन 2695 हे. तर सूर्यफूलाचे 8 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे.

जिल्ह्यात सध्या परिस्थितीत गहू या पिकाला विद्यापीठाच्या शिफारशीनुसार युरिया खत देण्यात यावे, परंतु हरभरा हे पीक घाटे धारण करण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यास नत्राची आवश्यकता नाही. हरभरा या पिकास युरिया दिल्यास पिकाची काईक( शाखा व पानांची) वाढ होऊन त्यामुळे अंदाजे 20 ते 25 टक्क्यांनी उत्पन्नात घट येऊ शकते. याकरीता शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत गहू पिकाव्यतिरिक्त इतर पिकांना (भाजीपाला व फळपिके सोडून) युरिया खत देण्याची आवश्यकता नाही.

त्यामुळे विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पिकाच्या योग्य गरजेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे, असे कृषी विकास अधिकारी श्री. दोडके यांनी कळविले आहे.