रस्ते आपघात रोखण्यासाठी तरूणाईने पुढाकार घ्यावा – अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील

रस्ते आपघात रोखण्यासाठी तरूणाईने पुढाकार घ्यावा – अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील

गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

 

गडचिरोली, दि.11 : रस्ते अपघातांमधे होणाऱ्या मृत्यूमधे 18 ते 45 वयोगटातील तरूणांचा समावेश जास्त आहे. वाहन चालवित असताना तरूणांनी नियमांचे पालन करण्याबरोबरच आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घ्यायला हव्यात असे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले. ते गडचिरोली येथे रस्ते परिवहन कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आरटीओ कार्यालयामार्फत राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी रस्ते सुरक्षा संदेश असलेल्या फलकांना फुग्यांद्वारे आकाशात सोडण्यात आले. यातून हेलमेट बाबत जनजागृती करण्यात आली आहे. ज्यांना ते संदेश फलक मिळतील त्यांना आरटीओ कार्यालयाकडून हेलमेट भेट स्वरूपात दिले जाणार आहे. शुभारंभ प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, रस्त्यांवर चालणाऱ्या व्यक्तीपासून सायकलस्वार, बैलबंडीधारक ते सर्व वाहनधारकांपर्यंत रस्ते सुरक्षा नियम पोहचणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये तसेच बाहेरील तरूण पिढीने याबाबत माहिती जाणून घेवून त्याचे आचरण केले पाहिजे. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, शिक्षणाधिकारी आर.पी. निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहा.पोलीस निरीक्षक पुनम गोरे, शाखा अभियंता श्रीमती काळे, मोटार वाहन निरीक्षक एस.वाय. जमखंडीवार, सी.टी. पाटील, वैष्णवी दिघावकर, वाय. आर. मोडक, एच.डब्ल्यू. गावंडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक एच.सी. काळे, के.एस.पारखी, जी.एच.खराबे, हर्षल बदखल उपस्थित होते.

यावेळी अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी रस्ते व वाहनांची अदयावत प्रगती या विषयातून रस्ते सुरक्षाबाबत महत्त्व पटवून दिले. शिक्षणाधिकारी आर.पी.निकम यांनी त्यांना कुटुंबातील व आसपास आलेल्या विविध रस्ते आपघातामंधून अनुभव सांगितले. अपघात हा आपल्या कुटुंबावर वाईट परिस्थिती आणणारा घटक आहे. अपघातातून सावरणे उर्वरीत कुटुंबाला सहज शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी अपघातामधील विविध आकडेवारी सादर करून युवकांनी थोडे जमीनवर पाय ठेवून हळूवार प्रगती करण्यसाठी धरपड करावी असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, आजच्या जगात प्रत्येकाच्या आयुष्यात खुपसाऱ्या डेडलाईन आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र धावपळ करावी लागते. मात्र यात आपण वाहन चालविण्याची प्रक्रिया खुपच थोडक्यात घेतो. मग धावपळीत अकारण आपल्याबरोबर इतरांच्या जीवालाही धोक्यात घालतो. यासाठी सावकाश व शांत डोक्याने आपले आयुष्य घडवा कारण ते खुप सुंदर व मोठे आहे असे ते पुढे म्हणाले. पुनम गोरे यांनी आपले विचार मांडताना जिल्हयात येणारे विविध अनुभव सांगितले. तर मोटार वाहन निरीक्षक मोडक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्ये युवक उपस्थित होते.